सिंबा

परवा एक मस्त पिक्चर बघितला - लायन किंग. तसा हा पिक्चर जुना झाला पण मी नव्याने बघितला म्हणून हा लेखरूपी कौतुक सोहळा. मूवी, वेब सिरीज या सगळ्या पासन मी तशी लांब असतोय, त्यामुळे मी ते बघायला बसणं म्हणजे सोपं गणित - एक तर मी डिप्रेस आहे किंवा रिकामटेकडी. त्या दिवशी पण यातलच एक होत - डिप्रेशन, सॅडनेस, मूडऑफ. स्क्रोल करता करता लायन किंग दिसला. ऍनिमेटेड मूवी - लहान मुलांसाठीचा. म्हणजे डोक्याला शॉट नाही. ठरलं तर... आज हाच बघायचा. 


खरं तर मी पिक्चर दीड किंवा दोन च्या स्पीड न पळवत बघतो, पण तो पिक्चर मला पळवू नाही वाटला. मि निवांत बघत बसलो, ते भारी भारी ऍनिमेशन, मस्त मस्त डबिंग केलेला आवाज, हिरवगार जंगल, सगळं कस एकदम भन्नाट. 


पिक्चर चालूच रहावा असं वाटत होत, पण संपला बिचारा. रात्र खूप झाली होती, त्यामुळं म्हटलं चला, झोपा आता. लाईट बंद केली आणि अंथरूणावर आडव झालो. डोळ्या समोर सिंबा मात्र अजून होताच. कमाल वाटली त्याची. कारण ऐकायचय? हे ऐका...


ज्यांनी पिक्चर नाही बघितला त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो, म्हणजे लिंक लागेल तुम्हाला पण. तर, सिंबा (सिंहाच छोटं बछड) आपल्या पिक्चर चा हिरो. त्याचे पप्पा, म्हणजे त्यांच्या जंगलाचा राजा. आता राजा, प्रजा म्हटलं कि व्हिलन तर असणारच ना... यांच्या कडे पण होते असे नमुने - कारनामे करणारे. त्यातला एक कारनामा, म्हणजे सिंबाच्या वडीलांना कपटाने मारण, अन त्याच खापर सिंबाच्या माथी फोडून त्याला जंगलाबाहेर पिटाळून लावणं. हा बिचारा पडला लहान आणि अल्लड. आपल्याच आतेष्टानी केलेल्या कपटाला फसला बिचारा अन त्या दुःखाच ओझं घेऊन निघून गेला. खूप दूर... दुसऱ्या दुनियेत. तिथं त्याचे काही नवीन दोस्त बनतात. त्यांच्या सोबत खुशाल जीवन जगायला सुरु करतो तो. मधे बरीच वर्ष जातात, सिंबा आता मोठा होतो. 


इकडं सिंबाच्या जुन्या घरी मात्र सगळा कायापालट झालेला असतो. राज्य बळकावलेला नवा राजा प्रजेचे अतोनात हाल करत असतो. कोण्या काळी हिरवगार असलेले, किलबिलाटान बहरलेल ते साम्राज्य आता मात्र स्मशानासारखं भकास झालं होत. नव्या क्रूर राजाच्या विरोधात जायची तशी धमक कोणा कडेच न्हवती फक्त एक सोडून. आपल्या सिंबाची बालमैत्रिण. फिल्मी भाषेत बोलें तो, गर्लफ्रेंड - आपल्या पिक्चरची हिरोईन. मनात कितीही जोश असला तरी ती एकटी त्याचा सामना करायला असमर्थ होती. त्यामुळे एक दिवस ती एकटीच, मदतीच्या शोधात बाहेर पडली. अन तिला भेटला आपला हिरो - सिंबा. खरं तर तिला दोन मिनिट विश्वासच बसला नाही कि सिंबा जिवंत आहे. कारण, सगळ्याना असंच वाटलं होत कि राजा सोबत हा छोटा राजकुमार पण देवाघरी गेला. पण त्याला इतक्या वर्षांनी त्याला असं समोर बघून तिला जितका आनंद झाला त्यापेक्षा जास्त एक उमेद आली - नव्या राजाच्या विरोधात बंड पुकारायची. सूरवातीला सिंबा अजिबात तयार नसतो माघारी परत जायला पण जेव्हा तिथली भयाण परिस्थिती तो ऐकतो, स्वतःच्या वडीलांची शिकवण आठवतो, तेव्हा तो जातो. पापींना शिक्षा देतो अन गेलेल राज्य परत मिळवतो. तो हे सगळं कस करतो ते तुम्ही पिक्चर मध्येच बघा. मी सांगितलं तर मजा जाईल त्यामुळं थांबतो आता इथं. 


तर, हि होती थोडंक्यात कहाणी. आता मुद्द्यावर येऊया कि मला हा सिंबा एवढा का भावला. तर... जेव्हा सिंबा त्याच्या घरुन निघून आला तेव्हा एकटाच आला. एखादी बॅग, चपला, खायला प्यायला किंवा अंगावर नेसायला काही घेऊन नाही आला. बर चला आता प्राणी हे असल काही वापरत नाहीत, त्यामुळे हे स्किप करू. पण शिकार करतातच कि, मग हत्यार तर नेऊ शकला असता, पण ते पण नाही नेलं ओ त्यान. बर. आता जेव्हा हिरोईन मदत मागायला आली तेव्हा सुद्धा हा सिंबा आहे तसा गेला. मदतीला ४ प्राणी घेतले नाही किंवा तयारीसाठी ४ दिवसाची मुदत मागून घेतली नाही. तुम्ही म्हणाल मला कदाचित वेड लागलय. विषय सुरूय जंगलातल्या सिंहाचा अन माझं काय सुरूय? कपडे? चपला? हत्यार? डोकं कामं करतय ना माझं? आहे आहे. एकदम शाबूत आहे माझं डोकं. त्यामुळे शब्दशा नका घेऊ, भावना समजून घ्या. 


आपण मनुष्य प्राणी. देवान आपल्याला थोडी जास्त बुद्धी दिलीय. कदाचित त्यामुळच आपण कधी कधी जरा जास्तच विचार करतो, ते पण बिनकामाचा. त्या दिवशी मी सुद्धा असच काहीतरी करत होतो, सिंपल गोष्टी कॉंप्लिकेटेड. जगायला काय लागत आपल्याला? अन्न-वस्त्र-निवारा. आता ते विकत घेण्यासाठी पैसा. मग तो पैसा येण्यासाठी एखादी नोकरी, मग त्या साठी काही कौशल्ये अन त्या साठी काही टूल्स. थोडं थोडं म्हणता शाळेत शिकलेल्या त्या तीन मुलभूत गरजा आज तिसावर जाऊन पोहचल्याहेत. गोष्ट इथं थांबत नाही, तर इथून खरी सूरू होते. ते कसं? तर असं... 


आपण सगळा संसार जमा करतो पण आख्ख आयुष्य तो सावरण्यात घालवतो. माझं घर, माझी गाडी, माझी बॅग, माझा फोन, माझा लॅपटॉप. खूप अटॅचमेंट असते आपल्याला त्या सगळ्याची. त्यामुळे एका ठीकाणाहून दुसरीकडे जायच तर आपण आख्खा संसार उचलून घेऊन जातो. सध्याच्या जगात हे इम्पॉर्टन्ट आहे, मी याला नाही म्हणत नाही. पण कुठं तरी या सगळ्या मुळं बेसिक जगणं आणि त्यातली बेसिक मजा कुठं तरी हरवून बसलोय, असं मला वाटत. (i might be wrong here) 


वयाच्या पाचव्या वर्षी पासून आपण शाळेत जातो. तेव्हा पासून जी रॅट रेस सुरु होते, ती कधी संपतच नाही. प्रत्येक गोष्ट शिकण्यामाग आपली भली मोठी wish-list असते. मी हे शिकणार, मग त्याची शंभरदा रिविजन करणार, मुलाखतीसाठी तयारी करणार मग कुठे जाऊन कॉन्फिडन्स बिल्ड करणार आणि मग लढायला जाणार. या सगळ्या मध्ये कधी surprise test आली तर माझी पाचावर धारण बसणार हे नक्की. किंबहूना ती बसतेच. तस अंगावर आलेलं आपण कसबस शिंगावर घेऊन वेळ मारून नेतोच. पण मनात विचारांच्या, भीतीच्या लाटा ह्या झेलतोच. मला जमेल का? माझी तयारी झालीय का? मला टूल्स वेळेत भेटतील का? मी पास होईल का? असे एक ना हजार विचार येऊन जातात मनात. 


त्या दिवशी मला हे सगळं आठवायच कारण म्हणजे, पिक्चर मधला तो सीन. जेव्हा सिंबा स्वतःच्या राज्यावर आलेलं संकट दूर करायला गेला तेव्हा त्यान क्षणभर पण विचार नाही केला कि मी कॅपेबल आहे का? माझ्यात तेव्हडी ताकद आहे का? मी करू शकेल का? मला जमेल का? सिंबाच्या मनात हे असलं काही आलच नाही कारण तो कधी काही कमवण्यासाठी शिकलाच नाही. तो शिकला कारण तो त्याचा गुणधर्म होता. स्वतःच्या सामर्थ्यावर त्याला इतका विश्वास होता कि त्याला कोणत्या टूल्सची गरज नाही वाटली. त्याच शरीर हेच त्याच साधन होत, वडीलजनांकडून मिळालेली वैचारीकता हिच त्याची संपती होती. गेलेलं राज्य परत मिळावण्यासाठी हे सगळं त्याला पुरेसं होत. 


हे झालं सिंबाच. नाही म्हणायला तो पडला एक प्राणी. पण माणूस म्हणवणारे आपण सुद्धा एक प्रकारचें प्राणीच ना? मानलं, थोडा जास्त मेंदू आहे आपल्याला, पण मग आपण का करतोय लाईफ एवढी कॉंप्लिकेटेड? लेट्स मेक इट सिंपल. 


असं पिक्चर मध्ये बघितल, inspire झालो म्हणजे जमलं अस नाहीय, हे मलाही कळत. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? बघूया जमतंय का... 


© आराधना खोत.