प्रोबेशन टू कन्फर्मेशन

      गोष्ट आहे, 5 मित्रांची. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या, विभिन्न संस्कृती, विभिन्न वारसा आणि विभिन्न पार्श्वभूमी लाभलेल्या. घरात आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा. कॉलेज कॅम्पस द्वारे बहुराष्ट्रीय कंपनीत निवड, या सगळ्यांना इथे या ऑफिस मध्ये एकत्र घेऊन आली होती. जसजसे दिवस सरत होते तसतसे त्यांचे प्रशिक्षण अधिक तासासाठी वाढू लागले. गृहपाठ वाढू लागला, ज्यामुळे एकत्रितपणे वैचारीक देवाणघेवाण करणे गरजेचे झाले. आपसुकच ब्रेकफस्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा-कॉफी एकत्र करायला सुरुवात झाली. त्यांच्यातील प्रत्येकजण या शहरासाठी नवीन होता, त्यामुळं शनिवार-रविवार, यांना एकमेकांशिवाय पर्यायच न्हवता. थोडक्यात काय, तर हे ५ जण एकत्रच वेळ घालवत असत. परिणामी, अगदी थोड्या वेळातच ते एकमेकांचे निकटचे मित्र झाले.


     ३ महिने उलटले. प्रशिक्षण कालावधी संपला आणि त्यांना वेगवेगळ्या टिम आणि प्रोजेक्ट वर नियुक्त केले गेले. प्रत्येकाचे वेळापत्रक आता बदलले. हळूहळू कॉफी ब्रेक, दुपारच जेवण, संध्याकाळचा timepass हे सगळं तूरळक बनलं. पूर्वीच्या लांबलचक गप्पा आता हाय-हेलो पुरत्या सिमित झाल्या. दररोज भेटणारे ते, आता फक्त शनिवार-रविवारीच एकमेकांना दिसू लागले. तथापि, कधीकधी 'वीकएंड डिप्लॉयमेंट' हे एखाद्याच, भेट टाळायच निमित्त पण बनून गेलं. हळू हळू त्यांचे मैत्रीचे हे बंध थोडे कमकुवत झाले आणि नवीन लोकांशी जुळले. नवीन लोक म्हणजे, त्यांचेच नवीन टीम मेट्स, प्रोजेक्ट मंडळी.


     प्रत्येकाचे पालनपोषण, पार्श्वभूमी वेगवेगळी असल्याने प्रत्येकाने आपल्या नवीन टीमशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेतलं. ओम बहिर्मुख(extrovert) होता, त्यामुळं पटकन त्याच्या टीममध्ये मिसळला. जय अंतर्मुख(introvert), त्यामुळं त्यान मिसळण्यास थोडा वेळ घेतला. जगदीशचे प्रकरण वेगळे होते. तो खूपच विनोदी स्वभावाचा मनुष्य होता पण त्याला अत्यंत गंभीर लोकांच्या टीममध्ये नेमण्यात आले होते. याउलट, सीता थोडीशी लाजाळू, परंतु तिला अति उत्साही टीम मिळाली. गीताचा विषयच वेगळा होता. तिच्या टीम मधून या ऑफिसात बसणारी ती एकमेव व्यक्ति होती, इतर सर्व वेगवेगळ्या शहरात किंवा देशांत होते. जशी प्रत्येकाची टीम भिन्न तसाच कार्यभार देखील भिन्न. प्रत्येकाने वेगवेगळ्या तंत्रज्ञानात काम करण्यास सुरवात केली. त्या ५ मित्रांच्या भेटी कमी झाल्या असल्या तरी त्या पूर्णपणे थांबल्या न्हवत्या. त्यामुळं जेव्हा जेव्हा ते भेटतील तेव्हा भोजन, भावना, समस्या, आनंद हे ओघानेच share व्हायच. एकमेकांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांविषयी त्यांना माहिती हि होतीच.


     बघता बघता एक वर्ष निघून गेल आणि तो दिवस उजाडला. त्यांच्या confirmation बद्दल घोषणा करण्याचा दिवस होता. ते उत्साही होते पण चिंताग्रस्त सुद्धा. संपूर्ण वर्षाच्या कामगिरीचा निकाल आज जगजाहिर होणार होता. कन्फर्म झालेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीमध्ये या पाचपैकी कोणास स्थान मिळाले हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. 


     आपापल्या कॉलेजमध्ये, प्रत्येकजण टॉपर होता. त्या सर्वांना, त्यांच्या महाविद्यालयातून अनेक उमेदवारांमधून शॉर्टलिस्ट केले गेले होते आणि कठोर मुलाखत प्रक्रियेद्वारे त्यांची निवड केली गेली होती. सर्व तितकेच हुशार होते परंतु तरीही या तपासणीच्या शेवटी त्यांचे मूल्यांकन कार्ड वेगवेगळे होते. याचा अर्थ, ज्याने अव्वल स्थान मिळवले होते, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ होता किंवा सर्वात कमी क्रमांकावर असलेल्याची निवड चुकीची होती, असे मुळीच नाही.


     कमी तांत्रिक स्कोअरवर असलेली व्यक्ती मठ्ठ नव्हती, ती अशा टीम चा भाग होती, ज्यांचा मुळात benchmark च मोठा होता. आपल्या टीमलीड नुसार जो सर्वोत्तम निकाल दर्शवू शकला नव्हता, त्याला वास्तविकतेमध्ये कधी तुलनात्मक संधीच मिळाली नव्हती (हेतुपूर्वक नाही हं, चुकून नकळत). ज्याला people skills वर कार्य करण्याचा अभिप्राय(फीडबॅक) मिळाला तो लाजाळू किंवा अंतर्मुख नव्हता. कदाचित तो भाषेचा अडथळा किंवा लहान शहराची जीवनशैली झटकून मेट्रो शहर संस्कृती अवगत करण्यातला विलंब होता. असे काही लोक होते ज्यांना, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक, सर्वोत्कृष्ट टीम व सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट सुद्धा मिळाले. आपल्या स्वत: मधून सर्वोत्कृष्ट आपण बाहेर काढण्यासाठी, त्या 'काही लोकांना' हे अगदी अनुकूल झालं. साध्या शब्दांत सांगायच, तर, प्रत्येकाचा प्रवास वेगळा होता. प्रत्येकाची शिकवण वेगळी होती. काहींनी आपल्या कमकुवतपणावर(weakness) काम सुरू केले तर काहींनी सामर्थ्यावर(strength) लक्ष केंद्रित केले. एखाद्याला अगदी सहज आणि स्पष्ट रोडमॅप दिसला तर काही अद्यापही त्याला गवसण्यासाठी धडपडत करत होते. परंतू ३ गोष्टी मात्र त्या सगळयांना अगदी परिपूर्ण कळल्या.

   १. वेळ कधी कुणा साठी थांबत नाही. त्यामुळं कॉर्पोरेट नामक रेल्वेच्या वेगा सोबत आपल्याला धावलच पाहिजे.

   २. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. त्यामुळे दुसऱ्याची itenary अनुसरू तर आपण आपल्या इच्छित स्थळी कधीच नाही पोचू शकणार.

   ३. दुसऱ्याच्या यश-अपयश आलेख वरून आपण आपले आपण आपले लक्ष्य ठरवू लागलो तर अवघड होईल. वर्त्तमानातल्या स्वतःला, भुतकाळातल्या स्वतःशी तुलना करून, आपणच कल्पिलेल्या भविष्यातल्या स्वतःला सत्यात उतरवण्यासाठीच आपण आपले टार्गेट सेट केलं पाहिजे. 


© आराधना खोत