आजकाल ऊन जरा जास्तच वाढलय. १२ चा ठोका सोडाच, १०-११ झाले तरी लाही लाही होते अंगाची. फ्रिज मध्ये भाज्यां पेक्षा कोल्ड्रिंक्स, ice-cream, सरबत, पन्ह, कोकम यांच्या बाटल्याच जास्त जागा काबीज करतात. त्यात हे वर्क फ्रॉम होम म्हणजे सोने पे सुहागा. आरामात उठा, बसून-लोळून कसही कामं करा, सगळं चालतंय. आपल्या सोयीने लंच ब्रेक करा, कॉफी ब्रेक करा, सगळं कसं आरामात आणि एसी च्या गार वाऱ्याला. आणि हा, आपल्या सोयीने केलं म्ह्णून पगारात कमी नाही बर का. महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेवढा व्हायचा तेवढा तो होतोच. अन कसंय, ते कॉरपोरेट मध्ये टीम बिल्डिंग च्या नावाखाली ज्या पार्ट्या व्हायच्या त्याला रिप्लेसमेंट म्ह्णून काही तरी गिफ्ट वरचेवर येत रहातात, ती वेगळीच. थोडक्यात काय, तर सगळं अगदी सुखकर सुरूय गेल्या एका वर्षापासून. कदाचित हा कोरोना आयुष्य सोपच करून गेलाय. फक्त बाहेर पडायचं नाही एवढंच. ठीकाय ना, घरी बसून कामं होतय, काही पाहिजे असेल तर ऑनलाईन ऑर्डर करता येतंय, सेम डे घरपोच डिलिव्हरी. पगारपाणी पण निवांत. काळजीच नाही कसली. प्रिविलेज्ड म्हणतात ते हेच बहुतेक. याच सुखात रममाण झालेल माझं ध्यान, दारावर साद घालणाऱ्या केळीवाल्या पोराच्या आवाजान भंग पावलं. तेवढ्यात आईचा आतून आवाज, "अग, काल गडबडीत केळी घ्यायची राहिली, बाहेर कोण तर विकायला आलय वाटतं बघ, जा एक डझन घेऊन ये जा." मी काय फारस कामात न्हवते म्ह्णून गेले बाहेर. १७-१८ वर्षाच, बारीक अंगकाठीच, टपोऱ्या घाऱ्या डोळ्याच, लांब सडक नाकाच आणि गव्हाळ वर्णाच ते पोरग आपल्या वजनापेक्षा जास्त असा, केळीन भरलेला तो गाडा ढकलत चाललं होत. माझ्या हाकेन तो थांबला. तस फार फार तर गेटच्या बाहेरच जायच होत मला, म्हणून मी अनवाणीच निघाले पण गेटच्या बाहेर पाऊल टाकताच चांगलाच पोळला माझा पाय. एक मिनिटात आले हा, असं म्हणून चप्पल घालून परत बाहेर आले मी. म्हटलं, "एक डझन दे. चांगली बघून दे हं". तो उत्तरला, " होय ताई. आपला माल एकदम क्वालीटी माल असतोय बगा. अर्धी तयार अन अर्धी कच्ची देतो. म्हणजे ४ दिवस जातील. मी होकारार्थी मान हलवत उन्हाच्या त्या तडाख्याचा विचार करत होते. त्याला म्हटलं, "आज ऊन जरा जास्तच आहे ना?" तो मुलगा माझ्या कड बघून हसला अन म्हणाला, "अहो ताई, रोज एवढच असतय. तुमी बाहेर पडत नसाल म्ह्णून कळत नसलं." मी हो हो म्हटलं, केळी घेऊन आत आले पण कुठं तरी मन अजून त्या रणरणत्या उन्हातच होत. मला २ मिनिट पण सहन नाही झालं ते ऊन अन ते बिचार पोरग एवढा जड गाडा हाकत दारोदार कसं बर भटकत असलं. नाही म्हणायला रोज असं दुपारच्या टाइमाला आवाज ऐकू यायचा त्याचा. बिचारा. त्याला कुठलं आलय आमच्या सारखं 'वर्क फ्रॉम होम'. अन तोच विचार करता करता मन झर्रकन एक वर्ष माग गेलं. पंतप्रधान मोदींनी देशाला केलेलं ते ऐतिहासीक भाषण आठवलं. "आज रात १२ बजे से देश मे इक्कीस दिन का lockdown होगा. मेरे प्यारे देशवासियों मेरी आप से विनती है, कि आप जहा भी हो, उधर हि रहो." त्यांची ती घोषणा होताच अगदी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघर महिनाभर पुरेल एवढ्या सामानान खचाखच भरवल होत आम्ही. बाहेर जायला बंदी, मग काय, अगदी हॉटेल च घरी बनवलेल त्या काळात. हरेक नमुन्याचे फूड ट्रायल. केक कर कूट पास्ता कर कूट डालगोना कॉफी कर. सगळं कस trending life नुसार चाललेल. सगळं बंद म्हणजे आपसुकच कामवाल्या मावशी यायचा प्रश्नच न्हवता. त्यामुळं साफसफाईची कामं एवढंच काय ते नावडत कामं. पण सगळयां रूममेट मिळून कामं केल्यानं जमलं ते पण. मस्त एन्जॉय सुरु होता आमचा. फेसबुक इन्स्टाग्राम यावरच्या stories ना तोटा न्हवता. यांच social media वर त्या दिवसात काही विदारक, विरोधाभासाची चित्र, memes इत्यादी फिरत होत. बघून मन हळहळत तर होतच. पण तेवढ्या पुरतं. परदेशांतील भारतीयांना भारतात आणायला विमान अन भारतातल्याच भारतीयांना मात्र शेकडो किलोमीटर ची पायपिट. यावर सुरु असेलेला विविध राजकारणी भक्तांचा वादविवाद तर विचारू नका. मी कधी त्यावर टिपणी केली नाही, कारण तो माझा प्रांत न्हवेच. असो. थोडक्यात काय, तर हातावर पोट असणाऱ्या लोकांची त्या काळात झालेली फरफट बघून वाईट वाटतं होत. बऱ्याच इंजिनीअर मित्रांना मिळालेला ब्रेक ऐकून त्यांच्या लोनच्या हप्त्यांच मलाच टेन्शन आलं. शाळा कॉलेजातल्या पोरांची मात्र चंगळ होती. शिकवणी नाही, गृहपाठ नाही, फक्त सुट्टी. भोलानाथान पाऊस नाही पण कोरोना नक्कीच आणला होता जणू.
माझं सगळं सुखात सुरु होत. ऑफिसच्या कामाचा भार असल्यामुळें 'काय करावं' हा प्रश्नच नाही पडला. खरं सांगायचं तर ज्यांना जबरदस्ती सुट्टी घ्यावी लागली होती, त्यांच्या बद्दल सुरवातीला हेवा वाटला होता. च्या माईला, सगळे सुट्टी वर मग आमीच का कामावर ? पण ५-६ दिवस झाल्या नंतर सुट्टीवरच्या मंडळीना कंटाळा आला तेव्हा वाटलं, चला बाबा, आपल्याला वेळ घालवायला काही तरी आहे. घरा पासून लांब असल्यामुळें फोन कॉल, ऑफिस कामं, घरकाम या सगळ्यात दिवस भूरर्कन उडून जात होता. दर विकेंड ला काय तर नवीन पदार्थ शिजत होते स्वयंपाकघरात. पण मज्जा म्हणून टाकलेल्या व्हाट्स अॅप स्टेटस मुळे हॉस्टेल/PG वर अडकलेल्या अन जेवणाचे हाल होणाऱ्या किंवा बेरोजगार झालेल्या कुणाच तर नकळत मन दुःखी होत होत हे तेव्हा जाणवलंच नाही. असंच बघता बघता कडक lockdown संपला अन निर्बंधांत थोडी शिथिलता आली. घरी जायची ओढ लागली. जुळवाजुळव केली अन निघालो. जन्मभूमी अन कर्मभूमी एकाच राज्यात असल्यामुळें फारसा प्रॉब्लेम आला नाही पण परराज्यांत जाणाऱ्या मित्रांचे हाल बघितले आणि पुनःश्च स्वतःच्या प्रिविलेज बद्दल समाधान वाटलं. ज्यांना परवडल ते वैयक्तिक कार करून गेले, बाकीचे आहे तिथे, आहे त्या परिस्थितीत राहिले, अडजस्टमेन्ट करत. दुरच्या ओळखीतला एक जण तर दुचाकी वर २ दिवस प्रवास करून गेला म्हणे. तिथं जाऊन पुन्हां qurantine वगैरे विषय तर वेगळाच होता. इटलीमधील भयाण परिस्थिती पाहून जेवढा जीव कासाविस झाला त्या पेक्षा जास्त झाला तो बेघर, असाह्य अशा आपल्याच देशातल्या हतबल जनतेचं झालेलं हाल बघून. नियम तोडला कि लाठीन शरीर फोडणाऱ्या पोलिसांचा दरारा आणि कुण्या गरजू लोकांना मास्क, खाऊ-पाणी वाटणाऱ्या त्याच पोलिसांच कोमल हृदय या नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी प्रकर्षाने दिसून आल्या. २४ तास ऑन ड्युटी असलेला एखादा कर्मचारी जेव्हा कोविड पॉसिटीव्ह बनून ऍम्ब्युलन्स मध्ये चढत होता तेव्हा जीव तळतळ तुटत होता. वितभर पोटासाठी, रांगा दोन्ही कडे लागल्या होत्या. फरक एवढाच होता, ऐपत असलेल्यांच्या 'मॉल' बाहेर तर ऐपत नसलेल्यांच्या, 'रेशन'च्या दुकानाबाहेर होत्या. रेशन कार्ड नसलेले तर भगवान भरोसेच होते. कोणतरी काहितरी मदत करेल याच आशेवर जगत होते. उद्या खायला काय मिळेल कि नाही या दंद्वात खोटी खोटीच पण मनाला समजूत घालत, दिवस भरभर सरण्याची प्रतीक्षा करत होते. या सगळ्याशी माझा थेट संबंध इथेही आलाच नाही. कारण, मी प्रिविलेज्ड होते.
हळूहळू नियमांत अजून शिथिलता येत गेली. उद्योगधंदे पुन्हा सुरु होऊ लागले. काहींना कामावर बोलावण आलं, काही तसेच राहिले, मार्केट डाउन च्या नावाखाली, सुशिक्षित बेरोजगार. वाटलं होत, हा चिनी विषाणू आमच्या कडक उन्हाळयात काही तग धरत नाही, पण निव्वळ एक अव्यवहारिक विचार होता तो. तो विजेच्या वेगान आला आणि देशाच्या कानकोपऱ्यात पोहचला. फक्त विमानतळ असलेल्या शहरांतच नव्हे तर दिवसातून एकदा लालपरीच दर्शन देणाऱ्या अगदी खेड्यापाड्यात सुद्धा गेला. सक्रिय रुग्णांचा तो वाढता आलेख, आरोग्य जोखमीत टाकून पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडलेल्यांची ती केविलवाणी धडपड, शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या माणसांची साधी नजर नशिबात नसलेले काही कमनशिबी, स्मशानात वेटींगवर असलेले ते मृतदेह, हे सगळ नुसतं ऐकूनच काळीज चिरत होत. या सगळयाच्या मी थोडंफार पण जवळ न्हवते, पूर्णतः सुरक्षित होते. मला चार भिंतीच्या आत राहून खात-पिता-कामं करता येत होत. मला बाहेर पडायची गरज न्हवती. कारण, मी प्रिविलेज्ड होते.
७-८ महिने सरले. सगळं पुर्वी प्रमाणे सुरळीत होतय असं वाटत होत पण तेवढय़ात त्या कोरोनान पून्हा डोकं वर काढलं. परवा बातम्यांना ऐकलं, कडक lockdown होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी सारखं यंदाही social media वर लोकांचे लगेच सल्ले देणं सुरु झालं. या सगळ्या मध्ये एक जाणवल, जो तो आपल्या परीनं विचार करतोय. माझ्यासारख घरात राहून ज्याचं घर चालत त्यांना, बाहेर बंद असलं तरी फारसा फरक नाही पडत. रोजंदारी वर कामं करणारा किंवा ज्याला घरून कामं करणं हा पर्यायच नाही त्याला मात्र या बंदचा फार फरक पडतो. घरी बसलो तर उपासमार अन बाहेर पडलो तर कोरोना मार. इकडं आड तिकडं विहीर असं झालय सगळं. मध्यंतरी mpsc परीक्षा घेण्या वरून पुण्यात झालेल्या दंग्याची चित्र पाहिली होतीत. हजारो मुलं रस्त्यावर उतरली होती. त्यांना न्हवती का स्वतःच्या जिवाची काळजी? कदाचित, स्पर्धा परीक्षांच्या अनिश्चित संघर्षासोबत हा कोरोना संघर्ष पण त्यांनी कबूल केला होता. काल एका मैत्रिणीचा फोन आलेला. टेन्शन मध्ये होती बिचारी. कसा बसा ब्रेक नंतर आता जॉब सुरु झाला होता तोवर परत, तो जायची भीती. आपल्याला कामावरुन कमी करायला नको म्ह्णून रात्रभर जागून extra कामं करत होती. स्वतःच अस्तित्व टिकवायची केविलवाणी धडपडत करत होती. पण मी आत्ताही निवांत होते कारण माझ्या सो कॉल्ड प्रिविलेज्ड मुळे मी कंपनीच्या पैशानेच या काळात सुद्धा स्वतःला नवीन कौशल्यानी अपडेट करत होते मी. जॉब टिकवण वगैरे तर खूप लांब होत माझ्यासाठी, कारण मी प्रिविलेज्ड होते.
पुढे परिस्थिती कशी असेल, काय होईल, कस होईल हे त्या देवालाच माहिती. वाईट दिवस सरतील अन सुखाचे दिवस पुन्हा येतील. पूर्वी प्रमाणे रस्ते पुन्हा गजबजतिल, लोक बिनधास्त, बिनामास्कचं फिरतील, हसत खेळत गप्पा गोष्टी करतील. चहाच्या टपरीवर चर्चा पुन्हा रंगतील. पण सध्या प्रिविलेज्ड असलेली मी आणि माझ्या सारखे इतर, तेव्हा पण प्रिविलेज्ड राहतील? की प्रिविलेज्ड च हे पारड, नियती दुसऱ्या कुणाच्या तर पदरात टाकील?
© आराधना खोत