खोप्याम्होरलं घरटं

   "गोपे, अग ये गोपे.. कुटं उलातल्यास? कवा धरन वरडालोय, पाऊस वळलाय, ते भात काढ बाहिर घातलय ते. कान फाटल्यात का काय तुझं?" बांधावर वाळत घातलेले कपडे गोळा करता करता चंदी तिच्या लेकीला, गोपीला तावातावान सांगत होती. "काडी लागली त्या मिरगाला.. काल पातूर डोकं पागळल एव्हडं उन हुत आन आज सांजच्यान बघ काय झालंय तेला. केवढं काळ दाटलय वरती. तरी तुझ्या बा ला सांगत हुतो, त्यो डोक्यावला पत्रा अंगावर पडायच्या आत, सुतळीन वरच्या अंगाला बांधून घे म्हणून. खरं नाई. आता ह्यो पाऊस, हाय नाय तेवढ डोक्यावरल छप्पर बी निऊ नये म्हंजे झालं. दारू तन सवड मिळाली, तर बायकोपोरी कड बघल, न्हवं. कुठं ढोसून पडलंय बेवड, ते आई यल्लमाच जानी. गोपे... अग ये गोपे. इतीस काय इकडं? का तिथं युन रम्माटा हानू आता. मगाधरन वारं सुटलंय. ईजा व्हाल्यात. मागल्या गंजी वरची ताडपत्री बी उडून गेल्या. ते भात भर ग बये लगबगीन, नायतर मागल्यागत आठवडाभर उपास व्हायचा. दिसभर वारं दिलंय तवा कूट बाईसायबीनीन ते शेर भर दिलया. या मिरगान ते वाहून जाऊ नये म्हंजी झालं" 


   चंदी, रामा पाटलाच्या मळ्यात, मजुरीवर कामं करणाऱ्या सदाची बायको. घरात, बारा महिने खायची वणवण. दारिद्र जणू पाचवीला पुजलेल. दारुडा नवरा अन पदरात एक लेक. दिवसभर, पाटलाच्या शेतात पडलं ते कामं करायच, कुणी काय दिलं बिलं तर ते आणून पोरीच्या पोटाला घालायच अन रोज रात्री दारू पिऊन आलेल्या नवऱ्याचा मार खाऊन झोपायच. पत्र्याच्या खोपटातला, रडत कन्हत सुरु असलेला, हीचा असा हा संसार. चंदीच्या या दुःखभऱ्या आयुष्यात एकच मायेची ऊब होती ती म्हणजे सगुणा. खोपटाला लागून असलेल्या नारळाच्या झाडावरची चिमणी. होय, चिमणीच. नाही म्हणायला, दोन डोळ्यांचा, दोन पायांचा, एका चोचीचा आणि मूठभर पंखांचा पक्षी तो. पण का कुणास ठाऊक, चंदीला आपली वाटायची ती. कदाचित चंदीच्या मनाला निस्वार्थी पणे ऐकून घ्यायची, म्हणून असेल. झाडलोट करताना, धान्य निवडताना, वैरण कापताना वगैरे हिच्या अवती भोंवतीच असायची. तासनतास सगुणे सोबत गप्पा मारत बसायची चंदी. मनातल बोलायची, काही दुखलं खूपलं तर सांगायची, सुख-दुःखाला तर कधी अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची सगुणे समोर. खरं तर, सगुणा, चंदीच्या बाल मैत्रिणीच नाव. जिवा भावाचि सख्खी दोस्तीनच म्हणा ना. लग्न नावाच्या बेडयां हातात घालून इकडं आलेल्या या चंदीला ती चिमणी बघून तिचाच भास व्हायचा. रंगान काळी सावळी अन अंगान नाजूक, म्हणून असेल कदाचित. असो. चंदीच्या खोपटासारखंच, सगुणेच पण एक खोपट होत. काड्या, सुकलेली पान, नारळाच्या शेंड्या, छोट्या तारा यांच्या सुरेख बांधणीन साकारलेल नाजूकस घरटं, अन परवाच घातलेली त्यातली २ अंडी. नवीन जीव येणार म्हणून कि काय, सगुणा आता आधी पेक्षा जास्त धावपळीत असायची. तिला जरा हातभार म्हणून, चंदी पण जमेल तसा, दाणा-पाणी ठेवायची वाटीत. मनानं हळवी पण तोंडानं करारी असलेल्या या चंदीच्या नादाला वस्तीवरच्या इतर बायका लागायच्या नाहीत. त्यामुळं सगुणा हिच काय ती चंदिची सवंगडी. जीव जडला होता दोघींचा जणू एकमेकींवर. म्ह्णूनच अवकाळी सूटलेल्या त्या भयाण वाऱ्याला बघून चंदीन आवाज दिला, "सगुणे, बये तु पण जा ग बाई तुझ्या घरटयात. ह्यो मिरगाचा पाऊस लय वाईट असतो म्हण. काय राखील अन काय नेईल याचा पत्या नाय." 


   हां हां म्हणता पाऊस सुरु झाला. सूर्य बुडायला अजून अवकाश होता, तरी पण सगळीकड अंधारून आल. धडकी भरावी अशा आवाजात विजांच थैमान सुरु झालं. ढगांनी तर स्पर्धाच सुरु केली, तू जास्त गडगडतोस की, मी. इतर वेळी, बेंबीच्या देठापासन केकाटणारी कुत्री, आज मात्र, पावसाच्या या रुद्रावतारान, शेताच्या कडेला उभारलेल्या ट्रॉलीखाली, निपचित पडून राहिलेली. म्याव म्याव करत वस्तीवल्या घरात दुधाचा फडशा पडणारी मनी तर कधीच गुडूप झाली. कुठं गेली कुणास ठाऊक. परसात वाळत घातलेल्या धान्यावर हैदुस मांडणारी चिमिची कोंबडी-पिलांची जत्रा कधीच खुराड्यात दडून बसलेली. एरवी, वाऱ्यान ऐटीत डूलत, सुखद गारवा देणाऱ्या परड्यातल्या झाडांची तर आज भितीच वाटू लागली होती. भांडणात एकमेकांच्या अंगावर धावून जावं, तशा फांदया एकमेकांवर जोराने आदळत होत्या. शेवग्याच्या शेंगा, अंगणात रपारप आपटत होत्या, जणू काही उसाची खोडवीच विखुरावित सगळीकड. पारिजातकाच्या नाजूक फुलांचा तो सडा आज शिळापलेला भासत होता. उगवत्या सूर्याच्या साक्षीन देव्हाऱ्यात बाप्पा चरणी जाणारी ती नाजूक फुले आज मात्र, या भयाण रात्रीच, मातीत विसावली जाणार होतीत. एखादा खांब गदागदा हलवावा, त्यावर बांधलेलं गोटयांच गाठोडं सुटाव आणि सगळ्या गोटया सांडाव्यात अगदी तसच नारळाच्या झाडावरन, बारके-मोठे, कच्चे-पिकलेले सगळेच नारळ दनादन जमिनीवर आपटत होते. वाटलं, एवढी वर्षें जमिनीत तग धरलेल, सगुणेच्या आसऱ्याच हे झाडं, ह्या पावसासमोर आज हार मानतय कि काय? उन्मळून पडायच तर नाई न्हवं? नको रे बाबा. असला इचार बी नको मनात. माझी सगुणी, बिचारी कुठं जाईल? मिनमिन डोळे उघडत, इवल्याश्या पंखानी फडफड करत, आकाशात उडायची स्वप्न बघणारी आणि आईच्या मायेची उब घेत पक्व होणारी तीची ती अंड्यातली २ पिल्ली, कशी तग धरतील या तुफानात?... असलं कायबाय चंदी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात गोपी खोप्यात आली. वर पासन खाली पर्यंत पार भिजली होती बिचारी. पण पोटाची आग शांत करणाऱ्या या भाताला(तांदळाला) आज आपण मिरगाच्या स्वाधीन न करता, चपळाईन गोळा केलं म्ह्णून भलतिच खुशित होती ती. वाटलं आई कौतिक करल पण तिचं ध्यान तर टपटप गळणाऱ्या पाण्याखाली पातेलि सरकवण्यात लागलेल. कुणी तरी छपरावर दगडं मारावीत असेच पावसाचे मोठाले थेंब पडत होते. एखाद भगदाड पडतय का काय हिच भीती. चंदी एका कोपऱ्यांत उभी राहून वर सरकणाऱ्या पत्र्या कड बघत होती. १०० वेळा सांगून पण तिच्या धन्यान, सुतळी काय आणली न्हवती. वाऱ्याच्या झोतानिशी हलणाऱ्या त्या पत्र्याचा काय तो निकाल लावणं गरजेच होत आज. आपल्या किडूक मिडूक संसार नामक प्रपंचात काय सापडतय काय, हे बघायला खोलीभर तिची नजर भिरभिरु लागली आणि कालच चिमिच्या मळ्यातन बांधून आणलेल्या लाकडाच्या मोळी वर तिची नजर स्थिरावली. लांबलचक वायरीच्या तुकड्यान चारदा गुंडाळली होती ती मोळी. लगबगीन उठून तिन ती मोळी सोडली आणि स्टुलावर उभ राहून पत्र्याच्या आतल्या टोकाला वायर बांधू लागली. गोपी एका कोपऱ्यांत उभी राहून चंदी ची चाललेली हि धडपड बघत होती. मधूनच होणाऱ्या विजेच्या कडाक्यान दचकून, दरवाज्याला बिलगत होती. वारा, पाऊस दोघ पण अगदी वेड लागल्यासारख गर्जून बरसत होते. चंदी, नवऱ्याच्या नावानं शंख फुकत, छप्पर घट्ट करण्यात मग्न होती. तेवढ्यात.... एक जोराचा झोत आला आणि चंदीच्या डोक्यावरचा पत्रा आपल्या सोबत घेऊन गेला. वायरीच्या आधारान पत्रा खाली ओढायचा तिचा केविलवाणा प्रयत्न फेल झाला होता. छत्री ला अचानक भोक पडावं अन त्यातन गळणाऱ्या पाण्यान आख्ख अंग भिजून जावं तस झालं. इथं, अंगच काय, तिचा सारा संसार भिजत होता. मोठ्या चपळाईने गोळा गेलेलं गोपीच भात(तांदूळ) पाण्याच्या लोटासोबत वाहून जाताना बघून जीव तूटला बिचारीचा. ३ दगडांवर मांडलेल्या चुलीतला विस्तव तर वाऱ्यान कधीच विझला होता. उरल्यासुरल्या राखेचा, वरन टपकणाऱ्या पाण्यान एव्हाना चिखल झाला होता. मगाशी गोळा करून आणलेल्या कपड्यांच्या ढीगाचा तर भिजून लादा झाला होता. हाताच्या बोटावर मोजता येणारी तिची भांडीकुंडी, खाली साचलेल्या पाण्यावरन तरंगत, खोलीभर हिंडत होतीत. लग्नात रुखवतातून आलेली एक पेटी होती चंदीची, ती मात्र आहे तिथंच रुतून बसली होती, एका कोपऱ्यात. खोप्यामध्ये इतर काही सामान न्हवतच म्हणा त्यामुळं ते वाहून जायचं किंवा त्याची नासाडी व्हायचा प्रश्नच न्हवता. धाडधाड आवाज करत उडून गेलेल्या त्या पत्र्याच्या आवाजान, किंकाळी फोडत, गोपी, चंदीला येऊन चिकटली होती. भिजल्या अंगान आणि भरल्या डोळयांनी, चंदी, उघडा पडलेला आपला संसार बघत होती. काय करावं काय सुचत न्हवतं. बाहेर कुठं जावं तर पावसान हौदुस मांडला होता. तिथंच कसबस डोक्यावर उरलेल्या अर्ध्या छपराखाली गोपीला कुशीत घेऊन बसली बिचारी. पोटात भूकेचा डोंब उसळला होता. घरात तर अन्नाचा दाणा पण शिल्लक न्हवता. बाहेर पावसाच्या माऱ्यान पडलेल्या शेवग्याच्या ढीगभर शेंगा हुत्या खरं त्यासनी शिजवायला चूल शिल्लक राहिली न्हवती. भुकेन व्याकुळ झालेलं, कोमेजुन गेलेलं गोपीच इवलस तोंड बघवेना चंदीला. नजर शोधू लागली, काही दिसतय काय खाण्याजोग. तेवढ्यात वरन नारळ पडला. जणू काही आकाशातन घबाड पडावं तसा अतिव आनंद झाला तिला. एका ढेंगेत तिन तो उचलून आत आणला. खूरप्यान चांगला सोलला आणि दाराच्या उंबऱ्यावर आपटून एका दनक्यात फोडला पण. चार फोडी गोपी ला देऊन एक फोड आपल्या तोंडात टाकली आणि पाऊस थांबायची वाट पाहू लागली. खरं तो काय थांबायच नाव काढत न्हवता, आज. त्याच तंद्रित दोघींना कधी डोळा लागला कळल नाही. 

  

 जाग आली ती, चिमिच्या कोंबड्याच्या आरवेनच. एव्हाना पाऊस थांबला होता. हळूहळू उजडायला लागलं होत. रात्री किती वेळ ओतत होता पाऊस, कुणास ठाऊक. गोपीला अलगद बाजूला झोपवून चंदी खोप्याबाहेर आली. बाहेर नुसता उकिरडा झाला होता. फ़ांद्या, दगड, धूळ, कचरा नको नको ते सगळं गोळा झालं होत. दारामागचा झाडू काढला आणि एका कडेन झाडू लागली. सहज नजर टाकली, काल वाऱ्याच्या वेगान हलणार नारळाच झाडं आता शांत झालं होत. बघून हायसं वाटलं तिला. झाडत झाडतच ती पुढच्या अंगाला गेली, वाटेत पडलेली फांदी बाजूला करणार इतक्यात...जे दिसलं ते बघून मटकन खालीच बसली. तिच्या सखीची, सगुणेची अंडी फुटून पडली होतीत. पुढ थोड्याच अंतरावर तिच इवलस घरटं पण उपड पडलं होत. काळीज जणू कापलच हे सगळं बघून. चंदीची नजर आता सगुणेला शोधू लागली. इकडं तिकडं फिरून-शोधून आली ती, पण काही पत्ता लागेना. शेवटी हार मानून दारात पडलेला पसारा आवरायला गेली ती. १०-१२ मिनिट झाली असतील तोवर तो आवाज कानावर पडला तिच्या... चिव.. चिव... अत्यानंदान मोगराच फुलला चंदीच्या मुखावर. पळतच बाहेर आली ती. सगुणा आली होती. कालच्या पावसात त्या जिवान तग धरला होता म्हणायचा तर. आज तिला घालायला दाणा न्हवता म्हणून फक्त पाणीच ठेवलं चंदीन, आपल्या लाडक्या सखीला. सगुणा पण अगदी आपलेपणाची कबुली देत गटागटा पाणी पिऊ लागली. "जीवच अडकला हुता बग बये, सगुणे. कुठं गेली होतीस ग सकाळधरन? जीव कालवला बग माझा हे सगळं बघून. तुझी पिल्लं तर जन्माआधीच गेली गं... मिरगान पार उघडा पाडला बघ आपल्या दोघींचा संसार. माझ्या डोईवर अर्ध तरी उरलं ग, तुझं मात्र सगळंच उडून गेलं." 



   चंदीच बोलणं सुरु असतानाच सगुणा उडून गेली. फूटलेल्या अंड्याभोवती २-४ घिरटया घालून जमिनीवर पालथ्या पडलेल्या आपल्या घरटयाकड वळली. कष्टान विणलेल ते घरटं असं विखुरलेल बघून तिच मन पण नक्कीच चिरल असेल. माणसांच बर असतय, घर पडलं तरी त्याचे वासे वापरून परत उभ तरी करता येत. बिचारी सगुणी. आहे तस घर चोचीत पकडून परत दुसऱ्या फांदीवर ठेऊ शकत न्हवती ती. घरटं पडलं पण जिद्द अजून तशीच होती. काय राहीलं, काय गेलं यांच्या फंद्यात न पडता ती उडाली, नव्या काड्यांच्या शोधात, नव्याने घरटं उभ करायला. तिच्या कड बघून चंदी स्वतःशीच हसली अन म्हणाली, "सगुणे, तूच ग बये. संसार मोडला पर तू मोडली नाईस. काल माझं छपार उडल्यावर धीरच गेलता बग. पर आज तू नवं बळ दिलस. लागतो गं बये मी पण कामाला आता, माझ्या मोडक्या खोपटाला आधार द्यायला. किती केला तरी मुका जीव तुझा, खरं लाख मोलाच शिकवून गेलीस बग आज. 'खोप्याम्होरलं तुझं हे घरटं' जपून ठेवीन बग कायम..." असं म्हणून समोर पडलेलं ते घरटं उचलून आत आणलं आणि अलगद पेटीवर ठेवून चंदी बाहेर पडली. पायात वहाण अडकवून, नव्या छपराच्या शोधात.....


     © आराधना खोत