मध्यमवर्गीयांच्या घरांमध्ये, जेव्हा लॅंडलाइन फोन बऱ्यापैकी स्थिरावले होते त्या काळात, म्हणजेच नवद्दच्या दशकात जन्मलेली आमची हि पिढी. टेलिफोन नामक तंत्रज्ञानाला, आम्ही खूप जवळून पारखे असलो तरी शाळेत परीक्षेपुरते का असेना, पण पत्र व्यवहार आम्ही केले आहेत. त्यावेळी एक कला म्हणून असेल, छान वाटत असेल किंवा मार्क चांगले मिळावेत म्हणून असेल. सणासुदिला जवळच्या मित्रांना किंवा आतेष्टांना पाठवलेल एखाद पत्र, आजही कुठं तरी अडगळीत नक्की सापडेल.
काळाच्या ओघात दशकं बदललीत तशी तंत्रज्ञानाची व्याप्तीही बदलली. लॅंडलाईन जाऊन घरोघरी मोबाईल आले. sms जाऊन व्हाट्सएप आलं हे जितकं खरं तितकंच त्याच्या जोडीनं आलेले फिचर्स, उदाहरणार्थ, एक ब्लू-टिक म्हणजे मेसेज पोहचला आणि दोन ब्लू-टिक म्हणजे मेसेज रीड केला हे सुद्धा ओघान आलचं. आता या सगळयाला चांगलं म्हणावं कि वाईट, हे ज्याच त्याच कामं. म्हणून तुर्तास मी माझ्या पुरतंच बोलते.
मला अजूनही आठवतं, शाळेत असताना, दिवाळीच्या सुट्टीत खास वर्गमैत्रिणी पासून कित्येक दिवस लांब असलो तरी, एक दिवस अचानक आलेलं तिच ते पत्र आख्खा दिवस आनंदात हरवून न्यायचा. सुट्टी संपून, कधी एकदा शाळा भरते आणि तिच्या समोर तो आनंद व्यक्त करतो असं व्हायच. कॉलेज ला गेलो तस या पत्राची जागा sms ने घेतली. आम्ही तेव्हा 'दिवसाला शंभर sms फ्री' वगैरे चे पॅक मारायचो. कधी कधी लांबलचक चॅट करत बसलो कि वेळ मस्त निघून जायचा. अर्थात sms मिळाला की नाही हे कळायला ब्लू-टिक सारखा ऑप्शन नसला तरी रिप्लायला येण्याऱ्या sms ची वाट पाहणे आणि त्या दिवसाचा sms चा आकडा शंभराकडे सरकायला लागला कि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त बोलणं कस जमवायचं, यासाठी उडणारी तारांबळ, या सगळ्यात सुद्धा खूप मजा यायची. आज हे सगळं आठवायच कारण थोडं खास आहे.
व्हाट्सएप च्या ब्लू-टिक वरून मेसेज रिसिव्ह आणि रीड यांच गणित थोडं बिघडल माझं. तर झालं असं, दोन ब्लू-टिक येऊन सुद्धा 'कुणा'चा तरी अपेक्षित रिप्लाय आला नाही तरी. हे एकदा दोनदा न्हवे तर बऱ्याचदा झालं. अर्थात साधी सोपी गोष्ट आहे हि. रिप्लाय आला नाही म्हणजे एक तर तो माणूस बिझी आहे किंवा मग त्याला रिप्लायच करायचा नाही आहे. शेवटी माणूस म्हटलं कि प्रत्येकाला थोडा बहुत इगो हा असतोच, तसाच मलाही आहे. (होता म्हटलं तर थोडं जास्त बर पडेल. कारण का ते कळेलच पुढे). तर, असा हा इगो.
पूर्वी कस बरं होत, पत्र पोहचलं कि नाही हे कळायला काही मार्ग नसायचा. शिवाय ढीगभर गावांच्या वेशी ओलांडुन आणि मूठभर टपालघरांचे शिक्के खात नेमकं कुठल्या दिवशी पत्र इच्छित स्थळी पोहचेल हे समजायला काही मार्ग नसायचा. त्यामुळं माझं पत्र लगेच वाचावं आणि समोरच्याने त्यावर लगेच रिप्लाय करावा अशी माफक अपेक्षा सुद्धा नसायची. लॅंडलाइनच्या जमान्यात हा वेटिंग पिरियड थोडा कमी झाला असला तरी, फोन केल्यावर अमुक अमुक व्यक्ती घरी नाही त्यामुळं फोन वर संभाषण होणे नाही, हे स्वीकारायची मानसिकता आपसुकच प्रत्येकात होती. sms चं पण थोड्या बहुत फरकाने सारखचं. मात्र हल्ली व्हॉटसएपच्या जमान्यात, सगळंच ऍडव्हान्स झालं आहे. आणि त्याचं स्पीडने लोकांच्या अपेक्षा सुद्धा ऍडव्हान्सच झाल्या आहेत म्हणायच्या.
मेसेजची इन्स्टंट डिलिव्हरी, त्याच इन्स्टंट रिसिव्ह्ड ऍकनॉजेमेंट वगैरे, मग ते रीड केलं असेलच असा इन्स्टंट समज आणि मग त्वरित रिप्लाय यावा अशी इन्स्टंट अपेक्षा. या सगळ्या इन्स्टंटच्या जमान्यात वाट पाहणे किंवा स्वतःला विसरून जाणे हे कुठंच नाहीए. इथं विसरून जाणे म्हणजे स्वतःच्या इगोला बाजूला ठेऊन 'समोरच्या जवळ माझ्यासाठी वेळ नाही असा फालतू मतितार्थ काढणे आणि स्वतःचा इतर कामंधंदा सोडून मेसेज का आला नाही या विचाराने डोक्याचा भुगा करून न घेणे इतकचं'.
मला नेमक्या शब्दात, हे सगळं जितकं सोप्या पद्धतीने मांडता आलं तितकंच अवघड गेलं होतं पूर्वी समजायला. अर्थात खूप मोठी मदत झाली ती काळाने मागे लोटून दिलेल्या जुन्या गोष्टींची. कारण रिप्लाय नाही आला म्हणून एक दिवस कंटाळून मी सहजचं , नेमक काय वाटतय, ते मोबाइल वर लिहायला घेतलं. अर्थातच, तिथं राग होता, हट्ट होता, थोड्या अपेक्षा सुद्धा होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फक्त मनातलं शब्दात उतरलं होतं, कुणाला सेंड होणार न्हवतं त्यामुळं इथं कुठला शाब्दिक फिल्टर न्हवता. अगदी जस्सच्या तस्स मोबाईलच्या 'नोट' सेक्शन मध्ये उतरलं होत सगळं. ते पोस्टकार्डवर लिहिलेल पत्र न्हवत किंवा sms साठी करत असलेला ड्राफ्ट न्हवता, जो एका क्लिकवर सेंड होणार होता. ते एक निव्वळ, कधीही पोस्ट न होणार डिजिटली लिहिलेल पत्र होतं. पण वर म्हटलं तस, मनातल आता फक्त शब्दात उतरल होत, त्यामुळं नाकावरच्या रागानं आता माघार घेतली होती, नटखट हट्टानं आता त्याचा लाडीवाळपणा थोडा कमी केला होता आणि वाजवी अपेक्षांच्या महागाईन थोडा उतरतीचाच आलेख पकडला होता. ह्या सगळयामुळे माझं मन मात्र बरचं हलक झालं होत. आणि इतकं सगळं रामायण ज्या माणसांच्या रिप्लाय न येण्याने झालं होत त्यांना याचा किंचितसाही गंध न्हवता. त्यामुळं आता समोरून जेव्हा स्वतःसाठी मेसेज आला होता तेव्हा 'आता मला कुणी तरी भाव दिला' या भावनेनेचं मघाचा तो इगो थोडा थंड झाला होता.
म्हणूनचं म्हटलं, जग जरी पुढ गेलं, तरी मला आता थोडं मागेमागेच रहायच आहे. तंत्रज्ञानांच्या मेट्रो स्पीडने थोडी भोवळ येतीय असं वाटायला लागलं कि लगेच पुढल्या स्टेशनवर उतरून, नजीकच्याचं जुन्या एखाद्या रेलगाडीच्या तिकीट रांगेत उभ राहायचं आहे. थोडसं वेट करायला नव्याने शिकायचं आहे. कारण स्वतःला थोडं विसरूनचं, आता नव्याने, स्वतःच्या, नव्या शोधात जायचे आहे.